Monday, March 22, 2021

‘जनता कर्फ्यू’

     ‘जनता कर्फ्यू’



वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय. २२ मार्च २०२०! कसं गेलं एक वर्ष ? करोनापासून केव्हा मुक्ती या प्रतिक्षेत की प्रादुवार्भाच्या भीतीत? एक वर्षानंतरही करोनाची भिती दूर झालेली नाही. करोनाविरुध्दची लढाई सुरुच आहे.


पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.या वर्षपूर्तीनिमित्ताने जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे.पंतप्रधानांच्या एका आवाहनावर देश थांबला होता.करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.त्यावेळी वाटले नव्हते करोनाविरोधात मोठी लढाई लढावी लागणार आहे.   


गेल्या वर्षी २२ मार्चला देशात ३३० रुग्ण बाधीत होते. आता देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख इतकी झाली आहे.तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार इतकी आहे. सध्या देशात ३ लाख ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने हाहाकार माजवला आहे.किती दिवस घरात राहून जीवन जगणार? लोकांनी करोनाबद्द्ल सरकारने दिलेले सर्व नियमांचे पालन करीत जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.काही भागात व लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही.


विषाणू प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश आले.देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. या लसीकरणावरच करोनाचे नियत्रंण अवलंबून आहे. लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख झाली आहे.लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.    


आता देशात जनता करोनाच्या दुस-या लाटेला सामोरे जात आहे. पहिली लाट मागच्या वर्षात स्थिरावली होती.देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.


परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी लागणार आहे.

No comments: