Wednesday, September 25, 2019

अमिताभ बच्चन एक नायक



अमिताभ बच्चन एक नायक 



बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार अलीकडेच जाहीर झाला. केवळ चित्रपटच नव्हे, तर देशातील प्रत्येक कलाक्षेत्रातून अमिताभ यांच्यावर आनंद व कौतुकाचा वर्षाव होत आहे. आत्तापर्यंत पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसेच तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे.

अमिताभ बच्चन यांची चित्रपट कारकीर्द 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटाद्वारे सुरू झाली.या चित्रपटासाठी त्यांना पदार्पण अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही मिळाला होता. त्यांनी शेकडो सिनेमात अभिनयाशिवाय अनेक सिनेमांना आपला आवाजही दिला आहे. तसंच छोट्या पडद्यावर त्यांचा 'कौन बनेगा करोडपती?' हा रिअॅलिटी शो गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.

अमिताभ बच्चन (मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन, जन्म: ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.

सात हिंदुस्थानी, आनंद, रेश्मा और शेरा, गुड्डी हे अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीच्या काळातले सिनेमा होते. 1973 मध्ये आलेल्या जंजीर या सिनेमामुळे त्यांची इमेजच बदलून गेली. हिंदी सिनेसृष्टीला अँग्री यंग मॅन मिळाला. हा अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास दोन दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन वावरले.
विजय खन्ना हे त्यांनी साकारलेलं पात्र हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोनच म्हणता येईल. त्यानंतर मग दीवार, शोले, जमीर, कभी कभी, हेरा-फेरी, रोटी कपडा और मकान, अग्नीपथ, डॉन, शक्ती, शहनशाह या आणि अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन केलं.
इन्सानियत सिनेमानंतर त्यांनी ब्रेक घेतला होता. त्यानंतर मृत्यूदाता या सिनेमाद्वारे कमबॅकही केलं. पण तो सिनेमा फ्लॉप झाला. मात्र 2000 पासून त्यांची चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. विविधांगी भूमिका अमिताभ बच्चन यांनी केल्या. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.
बागबान, कभी खुशी कभी गम, खाकी, लक्ष्य, बंटी और बबली, पा, विरुद्ध, फॅमिली, सरकार राज, बुढ्ढा होगा तेरा बाप, 102 नॉट आऊट हे आणि असे सिनेमा केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
१९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.

अमिताभ बच्चन ही आजची आपल्या एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीची जगभरातील ओळख आहे.तशी या वयाच्या पंचाहत्तरीतही वक्तशीर, क्रियाशील, अतिशय निष्ठेने आपली अभिनय बांधिलकी घट्ट असलेल्या ‘नायक ते चरित्रनायक, व्हाया काही नकारात्मक भूमिका असा दीर्घकालीन प्रवास सुरू असलेला हा ‘शहेनशाह‘.अमिताभ बच्चनचा नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाच्या काळात ‘एबी’ झाला आणि या दशकात तोच ‘बिग बी’ नावाने ओळखला जातोय.


त्याने १९८४ साली राजकारणात प्रवेश करुन उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात जनता पक्षाचे हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव केला आणि खासदार म्हणून यश मिळवले. पण लोकसभा सभागृहात तोंड न उघडल्याने ‘मौनी खासदार’ असा त्याच्यावर शिक्का बसला. आणि मग खासदारकीचा राजीनामा दिला. बिग बीचा हा अतिशय अवघड काळ होता.

अमिताभच्या यशात त्याच्या अभिनयाइतकाच त्याच्या भारदस्त आवाजाचा वाटा आहे. अमिताभपेक्षाही जास्त खर्ज असलेले आवाज सिनेसृष्टीत होऊन गेले परंतु आवाजाचा योग्य वापर, नाजूकपणा, चढउतार आणि पाॅझेस यांचं इतकं अचूक मिश्रण फार कमी जणांना साधलं. सलीम जावेदच्या धारदार संवादांना अमिताभने मूर्तरूप दिले. जंजीर, दीवार, शोले, त्रिशूल, डाॅन, शक्ती या सिनेमातले संवाद अमिताभमुळे गाजले. कभी कभी आणि सिलसिला मधलं गद्यकाव्य म्हणावं तर अमिताभनेच. तो संवाद म्हणताना कधीही आक्रस्ताळेपणा करत नाही. आवश्यक त्या शब्दांवर जोर देऊन, योग्य पाॅजेससह अतिशय स्पष्ट शब्दोच्चार ही अमिताभच्या संवादांची खासियत. सोबत योग्य त्या भावनांचा परिपोष आणि कमाल परिणाम साधण्याची किमया. त्याच्या असण्यावर काही पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या.


बिग बीच्या कर्तृत्वाचा हा पट ब्रॅन्ड अॅम्बेसेडर, अनेक प्रकारच्या जाहिरातीत सहभाग, सरकारी योजनेच्या माहितीपटात सहभाग असे करता करता वेबसिरिजमध्ये अभिनय असा सखोल आहे. त्यासाठीची क्षमता, सखोलता आणि बदलता दृष्टिकोन या महानायकाकडे निश्चित आहे.बदलत्या काळानुसार आणि हिंदी चित्रपटानुसार बीग बीने बदलणे पसंत केले आणि एक वेगळा आदर्श ठेवला.


अमिताभ बच्चन हे केवळ एका अभिनेत्याचे नाव नाही, तर बहुमुखी प्रतिभा आणि अष्टपैलूत्वाचे सार आहे. अभिनय, शब्दफेक, उच्चार, देहबोली, मुद्राभिनय, समोरच्या अभिनेत्याला त्याच्या आविष्कारासाठी पुरेसा अवधी आणि संधी देणारे औदार्य यांचा तो दुर्मिळ मिलाफ आहे.

No comments: