Friday, November 20, 2020

देवाची भेट

 देवाची भेट 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खुली करण्यात आली.आपल्या लाडक्या देवाची भेट घेण्यासाठी भाविक अधीर झाले होते. राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर भाविकांनी मंदिरांत दर्शनासाठी धाव घेतल्याचं पहायला मिळत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने काही ठराविक संख्येत भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे. 


पूर्वी देवाच्या दर्शनाला रांगा लावाव्या लागत होत्या.आता देवाला भेटण्याची नियोजित वेळ ठरवली जाणार आहे.देवाला भेटण्यास व दर्शनासाठी केव्हाही जाता येणार नाही. वेळ ठरवूनच जावे लागेल. भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे.पण ठराविक वेळेतच भेट होणार आहे. देवाला भेटण्यास इच्छा झाली आणि मी निघालो असे होणार नाही.   


मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पूर्वी मंदिरात देवाच्या दर्शनाला जाताना हातपाय धुऊन स्वच्छ होऊन जात होतो. भाविक मंदीरात जाताना स्वच्छता राखत नव्हते, असे वाटते. 

मंदिरात दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाणार असल्याने देवळात ढकलाढकली होणार नाही. भाविकांना शांतपणे देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.भाविकांच्या गर्दीला देव कंटाळलेला होता, असे वाटते. 


भक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने भक्तांनी देवाकडे कोणतेही मागणे करू नये,असे देवाचे म्हणणे असवे, असे वाटते.


मंदीरातील देवाची मूर्ती भाविकांना स्पर्श करता येणार नाही.देवाने भाविकांना दोन हात दूरच ठेवले आहे, असे वाटते.


मंदीर परिसराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी.मंदीर परिसरात खूप अस्वच्छता वाढलेली आहे, असे वाटते.


मंदिर समितीने हे निर्णय कायम ठेवावेत. भाविकांच्या गर्दीच व्यवस्थापन केले तरच लोकांचे दर्शन वेळेत व शांततेत होईल.पण दानपेटी भरण्यास वेळ लागणार आहे.तेव्हा दानपेटीवर लक्ष ठेवून निर्णयात मंदिर समितीने शिथिलता आणू नये.



विठू माझा लेकुरवाळा...संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची भेट हि आनंद द्विगुणीत करणारी ठरेल जेव्हा भक्तगण सर्व नियमांचे पालन करतील तेव्हाच. भक्तांनी देवाच्या मनात काय ते ओळखावे. आणि तसे वागावे.


देवाने भाविकांना शिस्त लावली आहे. भाविकांनी शिस्त पाळली तरच देवाचे आशिवार्द मिळतील.



No comments: